Monday, October 20, 2008

प्रश्न...

(मायबोली.कॉम वर आयोजित दुसर्‍या गझल कार्यशाळेत लिहिलेली गझल)

धुळीत ह्या पाऊल जराही मळले नाही
असा चाललो! वाटेलाही कळले नाही

भेट न व्हावी - हे ना जमले कधी तुलाही
तू टाळावे हे मजलाही टळले नाही

पोटाला जे चटके बसले... कसले होते?
चुलीत सरपण नावालाही जळले नाही!

फिरवत बसलो जाते, पण मी काय मिळवले?
ना ओवीही सुचली... काही दळले नाही

काय वेगळे घडते जर भेटलोच नसतो?
ह्या प्रश्नाने सांग तुलाही छळले नाही?