Thursday, April 17, 2008

पोहरा...

पंखांचा अंदाज शेवटी खरा निघाला!
वाटत होते अंबर जे; पिंजरा निघाला!

उगीच ना मी थांबवले अर्ध्यातच गाणे
त्यावेळी सूर नेमका कापरा निघाला!

ज्याने सावरले तो नव्हता कुणीच माझा
ज्याने धीर खचवला तो सोयरा निघाला

असेलही तू फुलाप्रमाणे जपले त्याला...
नवल काय पण, काटा जर बोचरा निघाला

शांतच होते, ज्या पाण्याने नाव बुडवली
मला तारले ज्याने तो भोवरा निघाला

चालवती जे देश तयांची सभा पाहिली
झाले रंजन! तसा तमाशा बरा निघाला!

शब्दांचा तर आड तसा भरलेला होता...
कसा रिता मग अर्थाचा पोहरा निघाला ?

वणवा...

(मराठीगझल.कॉम वर आयोजीत कार्यशाळेत लिहिलेली गझल)

हुंदका साधा तुझा सांगून गेला,
शब्द माझा केवढा टोचून गेला!

मी कधी ना घेतले चाळून कोणा
भेटल जो, तो मला गाळून गेला

कोणती इच्छा अशी धरली मनी तू ?
पापणीचा केस खंतावून गेला!

बांधले होतेच त्याने पाय माझे,
आज माझे पंखही छाटून गेला

हा खुलासा मागती आक्रंदणारे
’तो चितेवर का असा हासून गेला ?’

ज्यास मी होत्या दिल्या ठिणग्या कितीदा
आज तो वणवा मला विझवून गेला!

किनारे...

(वैभव जोशी यांनी मायबोली.कॉम वर आयोजीत केलेल्या कार्यशाळेत लिहिलेली गझल.)

ऋतू येत होते, ऋतू जात होते
तरी ताटवे मग्न झुरण्यात होते!

म्हणाया तुझे आटणेही अकाली...
तुझे दाटणेही अकस्मात होते!

समजण्या मला लागला वेळ थोडा
तुझे प्रेम लपले नकारात होते!

मला सांग होता कसा दोष माझा ?
जरी ओठ माझे, तुझे दात होते!

तरसलो जरी मी, बरसलेच नाही
खुजे मेघ त्या आसमंतात होते!

तिथे पाहिली दानवांचीच सत्ता
तिथे देव नुसते पुराणात होते!

इथे कोणती लाट घेऊन आली ?
किनारे मला हे कुठे ज्ञात होते ?